मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास असलेल्या जाधव यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. साताऱ्यातीलयेथे आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनंजय जाधव यांनी पोलीस दलात अनेक पदं भूषवली. साताऱ्यातील पुसेगाव इथं १९४७ साली त्यांचा जन्म झाला. तिथंच त्यांच प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते वाई इथं गेले. पुढं एमएससीची पदव्युत्तर पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले.
शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असतानाच ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. १९७२ मध्ये ते यूपीएससीची परीक्षा पास झाले. आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी धुळ्यातून कामाला सुरुवात केली. त्यानंतर वर्धा, नगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं. २००४ साली पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली. २००७ पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदी त्यांना संधी मिळाली. २००७ ते २००८ पर्यंत ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. याच पदावरून ते सेवानिवृत्त झाले. पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. याशिवाय, इतरही अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते.
पोलीस सेवेतून निवृत्तीनंतरही जाधव कार्यरत होते. निवृत्तीनंतरची पहिली दोन वर्षे त्यांनी एमपीएससी बोर्डावर काम केलं. त्यानंतर त्यांच्या मुळ गावी, पुसेगाव या ठिकाणी एक शिक्षण संस्था सुरू केली. सामाजिक कार्यातील त्यांच्या विशेष रुचीमुळं त्यांना राजकीय पक्षांतून ऑफर होत्या. मात्र, राजकारणापासून अलिप्त राहणेच त्यांनी पसंत केले होते.
