तालुक्यातील प्रस्तावित नाणार तेलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांबाबत आत्तापर्यंत फक्त ९ तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत.
नाणार परिसरातील चौदा गावांमध्ये गेल्या काही वर्षांत जमीन खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यातून कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली आहे. मात्र याचा फायदा मूळ शेतकऱ्यांना कमी प्रमाणात झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच, परप्रांतीयांनी या भागातील जमिनी कवडीमोल किंमतीने खरेदी केल्याचे आरोप केले गेले आहेत. माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनीही काही महिन्यांपूर्वी नाणार परिसरात झालेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर, जमीन खरेदी विक्री मध्ये फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा जमिनी मिळवून देण्याचीही मागणी त्यांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर प्रकल्प परिसरातील गावांमध्ये जमिनींच्या झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारासंबंधित शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनातर्फे चौकशी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने प्रांत कार्यालयासह संबंधित तलाठी सजांमध्ये स्थापन केलेल्या तक्रार स्विकृती कक्षामध्ये केवळ नऊ लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामध्ये तारळ ४, उपळे २ आणि चौके, नाणार, गोठिवरे येथील प्रत्येकी १ अशा एकूण ९ तक्रारींचा समावेश आहे. सहहिस्सेदारांमधील अंतर्गत वाद, जमीन विक्रीमध्ये कमी पैसे मिळणे अशा स्वरूपाच्या या तक्रारी असल्याची माहिती प्रांत कार्यालयातून देण्यात आली.
शिमगोत्सवाला मुंबईकर चाकरमनी येत्या दोन दिवसांमध्ये गावी येण्याची शक्यता असून त्यातून, तक्रार अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
