बिहारमधील सिवानमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणे व्हायची. मात्र, तो अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलेल हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. बसंतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, बसांव गावातील राजेश राय (वय ४२) याचे आपली पत्नी रामकली देवी हिच्यासोबत घरगुती वाद व्हायचे. सोमवारी सकाळीही दोघांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून टोकाचा वाद झाला. रागाच्या भरात त्याने पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी राजेश याने स्वतःच्या पोटावर वार केले होते. पोलीस उपअधीक्षक आणि बसंतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी आशुतोष कुमार यांनी सांगितले की, या घटनेची माहिती ग्रामस्थांनी आम्हाला दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. पंचनामा केला. दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मृत दाम्पत्याला चार मुले आहेत. त्यात तीन मुले आणि एक मुलगी आहे. ती मुले आपल्या आजीच्या घरी गेले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
