राज्यात काही दिवसांपासून करोनाच्या संसर्गात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाइलाजाने कडक टाळेबंदी लागू करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची लस घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. करोनाची लस घेण्यात कोणतीही भीती नाही. करोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लशीचे काही दुष्परिणाम नसून, पात्र असलेल्या प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी के ले. गुरुवारपासून कल्याण-डोंबिवलीत कडक निर्बंध लागू करण्यात आले. जळगावात जनता संचारबंदी जाहीर झाली आहे. नागपुरातही टाळेबंदीचा निर्णय जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि संभाव्य टाळेबंदीबाबतही भाष्य के ले.
लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर, वारंवार हात धूत राहणे आणि अंतरनियमांचे पालन महत्त्वाचे आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही; पण राज्यात करोनाचा धोका वाढतो आहे. अनेक मोठ्या शहरांत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिस्थिती न सुधारल्यास काही ठिकाणी नाइलाजाने कडक टाळेबंदी लागू करावी लागेल. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगून टाळेबंदी टाळावी. पुढील दोन-तीन दिवसांत त्याबाबत निर्णय घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
