मुंबईहून रायगड जिल्ह्यातील अलीबागनजीकच्या काशीद या निसर्गरम्य सागरी किनाऱ्यास आता अवघ्या दोन तासात पोहोचणे शक्य होणार आहे. सागरी महामंडळाकडून काशिद बंदरावर ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी आणि पॅसेंजर जेट्टी उभारण्याचे काम सुरू झाले असून, यावर्षाच्या अखेरीस त्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईतील पर्यटकांना मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी नुकतीच दिली आहे. मुंबईकर पर्यटकांना काशीदला जाण्यासाठी सध्या पाच तासांचा अवधी लागतो.
मुंबईहून काशीदला जाण्यासाठी मुंबईकरांना अलिबागमार्गे रस्त्याने जावे लागते. खराब रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे या प्रवासासाठी सुमारे पाच तासांचा वेळ लागतो. तितकाच वेळ परतीच्या प्रवासाला लागत असल्याने मुंबईकर पर्यटक काशीदला जाण्याचे टाळतात. या प्रकल्पामुळे सागरी मार्गाने जाण्यासाठी दोन तास लागणार आहेत. त्यामुळे पर्यटकांचा वेळ वाचणार असून, काशीद परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल. तसेच पर्यटकांना सागरी पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.