कोळपा गावच्या महिला सरपंच नामधारीच; ग्रामपंचायतीचा निधी अन् सासऱ्याच्या नावे चेक!

कोळपा या गावात अजब प्रकार उघडकीस आला आहे. मागील तीन वर्षांपासून महिला सरपंच गावाचा कारभार फक्त नावालाच पाहत आहेत. प्रत्यक्षात हा सर्व कारभार त्यांचे सासरे चालवत होते. ग्रामनिधीही त्याच्याच नावे येत असे. या सर्व प्रकाराबाबत गावात संतप्त वातावरण तयार झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महिला सरपंचाला अपात्र ठरवले आहे. कोळपा लातूर शहरापासून अवघ्या 17 किलोमीटर वरील गाव. 1370 मतदान करणाऱ्याची संख्या असलेल्या ह्या गावाची लोकसंख्या 2000 हजार आहे. तीन वर्षांपूर्वी या गावाच्या सरपंचपदी रेणुका खराबे यांची वर्णी लागली. सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार त्यांच्या हाती आला. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे सासरे शिवाजी खराबे हेच कारभार पाहू लागले. यांचा एवढा हस्तक्षेप वाढला की त्यांनी चक्क स्वतःच्या नावाने धनादेश काढण्यास भाग पाडले. वर्षाकाठी कोळपा गावातून 3 लाखापर्यंतचा ग्रामनिधी वसूल केला जातो. यामध्ये पाणीपट्टी, घरपट्टी यासारख्या बाबींचा समावेश आहे. मात्र, या ग्रामनिधीतच अपहार झाल्याचे समोर आले आहे. सरपंच यांचे सासरे शिवाजी खराबे यांच्या नावे एक नाही. दोन नाही तब्बल आठ वेळा धनादेश काढण्यात आला आहे. कोणत्या अधिकारात हा निधी त्याच्या खाती वर्ग करण्यात आला. या बाबत उलटसुलट चर्चा होऊ लागली. त्यांनी जमा झालेल्या निधीचा हिशोबही दिला नाही.

याबाबत प्रशासकीय पातळीवर तक्रार करण्यात आली. प्रशासनाच्या तथ्य लक्षात आल्यावर लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी याची तात्काळ दखल घेत कारवाई केली. महिला सरपंच रेणुका खराबे यांना अपात्र ठरवण्यात आले. निधीचा झालेल्या अपहाराबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज संस्थेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी यात महिलांचे आरक्षण वाढविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात आजही कारभार मात्र घरातील पुरुष मंडळीच चालवत आहेत. याच वृत्तीने मग असे प्रकार होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *