ग्राहकांना ठसका! लालबागचं मसाला मार्केट पाच दिवस बंद

तब्बल अडीच महिन्यानंतर सुरू झालेलं लालबागचं प्रसिद्ध मसाला मार्केट पुन्हा एकदा बंद करण्यात आलं आहे. लालबाग परळ परिसरात करोना रुग्ण सापडल्याने हे मसाला मार्केट आजपासून पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

मुंबईत करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडल्याने मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले होते. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून मुंबईचे सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र, करोना रुग्ण ट्रेस झाल्याने आणि रुग्णसंख्याही कमी झाल्याने मुंबईसह राज्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती. तब्बल अडीच महिन्यानंतर मुंबईतील अनेक व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. लालबाग येथील असलेलं प्रसिद्ध मसाला मार्केटही सुरू झालं होतं. पण काही दिवसांतच या परिसरात करोनाचे रुग्ण आढळल्याने हे मार्केट पुन्हा एकदा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गैरसोय झाली आहे.

अडीच महिन्यानंतर आम्ही मार्केट सुरू केलं होतं. त्यामुळे चार पैसे हातात येतील असं वाटत होतं. अनेक ग्राहकांनी मसाल्याची ऑर्डरही दिली आहे. अगदी वसई, ठाणे, कर्जतपर्यंतच्या ग्राहकांनी मसाल्याच्या ऑर्डर दिल्या आहेत. त्यांना आम्ही मसाला घेऊन जाण्याच्या वेळाही दिलेल्या आहेत. पण लालबाग परिसरात करोना रुग्ण सापडल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी पाच दिवस संपूर्ण परिसर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना मसाले द्यायचे कसे? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. या पाच दिवसात लांबून येणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय होणार असल्याचं येथील मसाल्याचे व्यापारी विजय चव्हाण यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय बसला आहे. काय करावं तेच कळत नाही. आता कसं तरी जगावं लागणार आहे, असं चव्हाण म्हणाले.

तर किमान ज्यांनी ऑर्डर दिली आहे, त्यांना मसाले देण्यापूरती तरी प्रशासनाने सूट द्यायला हवी, अशी मागणी या व्यापाऱ्यांमधून होत आहे. लालबाग परिसरातील मसाला गल्लीत अनेक मसाल्यांचे दुकाने आहेत. येथून मसाला घेऊन जाण्यासाठी बाहेरून लोक येत असतात. त्यामुळे या परिसरात मोठा आर्थिक व्यवहार होत असतो. परंतु, करोनामुळे या गल्लीतील सर्व आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत.
दरम्यान, काल राज्यात करोना संसर्गामुळे २४८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर ३ हजार २१४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. काल विविध रुग्णांलयातून १ हजार ९२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ६९ हजार ६३१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *