ट्रक चालकाकडून श्रमिकांची फसवणूक

लॉकडाउनमुळे अडकलेल्या अन्य राज्यांतील सर्व श्रमिकांना मूळ गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वेची विशेष सुविधा दिली आहे. मात्र अन्य मार्गाने गाव गाठणाऱ्या श्रमिकांची फसवणूक होत असल्याच्या घटनाही घडत आहेत. मिरा भाईंदर येथून पश्चिम बंगाल येथे जाऊ इच्छिणाऱ्या काही श्रमिकांकडून लाखो रुपये घेऊन एका ट्रकचालकाने पोबारा केल्याची घटना समोर आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागू झाल्याने देशभरातील विविध भागांत असंख्य स्थलांतरित श्रमिक अडकले आहेत. त्यामुळे रखरखत्या उन्हात अनेक श्रमिकांनी पायपीट करत आपल्या मूळगावी जाण्याचा मार्ग निवडला आहे. तर काही श्रमिक मिळेल त्या वाहनाने गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मिरा-भाईंदर शहरात रोजगारासाठी पश्चिम बंगालच्या कोलकता शहरातून अनेक श्रमिक आले होते. महिला घरकाम करत होत्या, तर पुरुष इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करीत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगार गेल्याने ६० श्रमिकांनी दोन लाख रुपये गोळा केले. कोलकाता येथे सोडण्यासाठी हे पैसे त्यांनी मिरा रोडमधील एका ट्रकचालकास दिले. ट्रक चालकाने बुधवारी विशिष्ट जागी यावे असेही ठरले. परंतु ठरलेल्या वेळेत हा ट्रकचालक आलाच नाही. शिवाय त्याचा फोनही लागत नसल्याने या श्रमिकांनी काशिमिरा पोलिस ठाणे गाठले.

श्रमिकांनी सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता ट्रकचालक तेथे राहातच नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसांनी या श्रमिकांच्या भोजनाची व निवाऱ्याची सोय करून दिली. यानंतर या श्रमिकांना पर्यायी व्यवस्थेद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *