देशापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदर अधिक

करोना रुग्णांचा महाराष्ट्रातील मृत्यूदर हा देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. देशात करोनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण हे ३.२४ इतके आहे, तर महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण ३.७१ टक्के इतके असल्याचे दिसून आले आहे. जगामध्ये हा मृत्यूदर ६.९६ टक्के इतका आहे.

करोनामुळे देशात २,२९३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी ८६८ महाराष्ट्रातील आहेत. आत्तापर्यंत जगात २ लाख ७८ हजार ८९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण ७०,७५६ जणांना करोनाची लागण झाली असून, राज्यात २३ हजार ४०१ बाधित आहेत. देशातील विविध राज्यांमधील मृत्यू दराच्या विश्लेषणामध्ये पश्चिम बंगालचा क्रमांक सर्वात वरचा आहे, तेथील मृत्यू दर ९.२१ टक्के इतका आहे, तर गुजरातमध्ये हे प्रमाण ६.०१ टक्के इतके आहे. मध्य प्रदेशमध्ये हे प्रमाण ५.८४ टक्के तर कर्नाटकमध्ये ३.६० टक्के, हिमाचल प्रदेशमध्ये ३.३९ टक्के आहे.

मुलांमध्ये वाढती लागण

लहान मुलांमध्ये करोनाची लागण होत नसल्याचा दावा खोटा ठरला असून, शून्य ते १० वयोगटामध्ये संसर्ग झालेल्या मुलांची संख्या ७७० असून ११ ते २० वयोगटामध्ये ही संख्या १५७९ आहे. २१ ते ३० या वयोगटामध्ये ४८१७ जणांना करोनाची लागण झाली असून, इतर वयोगटापेक्षा यामध्ये करोनाची लागण होण्याचे प्रमाण आता वाढताना दिसते.

रोज सरासरी २१ मृत्यू

कोणत्या ना कोणत्या प्रकारची व्याधी असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ७३ टक्के इतके आहे, तर स्त्री आणि पुरुषांमध्ये हे प्रमाण ३८ आणि ६२ टक्के इतके आहे. १ ते ११ मेपर्यंत मुंबईमध्ये झालेल्या मृत्यूंचा अभ्यास केला तर रोज सरासरी २१ जणांचा मृत्यू होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. १ ते ११ मे या दरम्यान अनुक्रमे ५, २७, २१, १८, २६,२५,२५, २७, १९, २० इतक्या मृत्यूंची नोंद मुंबईमध्ये झाली आहे.

सुविधांची उपलब्धता

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, वाढता संसर्ग लक्षात घेता वैद्यकीय तयारी केली आहे. वांद्रे येथे एक हजार खाटांचे रुग्णालय तातडीने उभारण्यात आले असून त्यातील पाचशे खाटांना ऑक्सिजन सुविधा देण्यात येणार आहे. इतर रुग्णालयांमध्येही खाटांची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. घरामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या रूग्णांना पालिकेने दिलेले निकष काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. विलगीकरण कक्षातून सोडण्यापूर्वी रुग्णांची करोना चाचणी करण्यात येणार आहे.

विविध राज्यांमधील मृत्यूचा दर:

– पश्चिम बंगाल : ९.२१%

– गुजरात : ६.०१%

– मध्य प्रदेश : ५.८४%

– महाराष्ट्र : ३.७१%

– देश : ३.२४%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *