शहराचे कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा येथील चौदाशे नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकार, राज्य सरकार, नागपूर महानगर पालिकेसह आयसीएमआरला नोटिस जारी केली आहे. सतरंजीपुरा येथील 1 हजार 408 नागरिकांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या महानगरपालिकेच्या कृतीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. छावणी परिसरातील रहिवाशी मोहम्मद निशात यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
सतरंजीपुरा येथील नागरिकांना सक्तीचे क्वॉरंटाईन करताना आयसीएमआर व आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशाचे पालन महापालिकेने केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. हाय रिस्क संपर्क व कोरोना पॉजिटीव्ह रूग्णांनाच 14 दिवस क्वॉरंटाईन करण्याचे निर्देश असताना महापालिकेने नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या 1 हजार 408 नागरिकांना क्वॉरंटाईन केले आहे. ज्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. ते हाय रिस्क संपर्कातील आहे की नाही हे तपासून पाहण्यात आले नसल्याचं याचिकेत म्हणण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
