‘कोविड’च्या भीतीमुळं रक्तदान घटले! मुंबईत रक्ताच्या तुटवड्याची भीती

‘कोविड १९’चा संसर्ग होण्याच्या भीतीनं रक्तदाते पुढं येत नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मुंबईत पुढील काही दिवसांत रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार व सामाजिक संस्था कामाला लागल्या आहेत.

मुंबईत रोजच्या रोज मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागते. त्यातच लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुढं ढकलण्यात आलेल्या शस्त्रक्रिया देखील आता कराव्या लागणार आहेत. कारण, सर्वच शस्त्रक्रिया फार काळ पुढं ढकलता येत नाहीत. अशावेळी रक्ताची अधिक गरज लागणार आहे. मात्र, सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचं प्रमाण खूपच कमी आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये केवळ आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. करोनाच्या संसर्गाच्या शक्यतेमुळं रक्तदान शिबिरं आयोजित करण्याला मर्यादा आहेत. त्यामुळं गृहनिर्माण सोसायट्यांनी छोटे कॅम्प घ्यावेत, यासाठी सरकार व सामाजिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या एका अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली. ‘रक्तदानामध्ये सध्या अनेक अडथळे आहेत. आम्ही गृहनिर्माण सोसायट्यांशी संपर्क साधत आहोत. मोबाइल व्हॅनद्वारेही रक्त गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रक्ताचा तुटवडा ही सध्या जागतिक समस्या आहे. हा केवळ मुंबईचा प्रश्न नाही. आम्ही मुंबईतील सार्वजनिक मंडळांना यासाठी आवाहन केलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून पाच ते दहाच्या गटानं रक्तदान शिबिरं घेण्याबद्दल सुचवलं आहे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानंतर मार्चच्या शेवटच्या व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं झाली. त्यामुळं एप्रिल महिन्यात रक्ताचा तुटवडा भासला नाही. मात्र, कोविडचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यानं नियमित रक्तदान करणारे लोकही पुढे यायला कचरत आहेत.

‘मे आणि जून महिन्यांत सुट्ट्यांमुळं दरवर्षी रक्ताचा तुटवडा भासतो. अशा वेळी आम्ही बऱ्याचदा रुग्णालय कर्मचारी व पोलिसांची मदत घेतो. मात्र, सध्या यातील बरेच लोक ‘कोविड’विरुद्धच्या लढाईत गुंतले आहेत. शिवाय, त्यांनाही स्वत:च्या आरोग्याची भीती आहे. थॅलेसेमियावर उपचार देणाऱ्या रुग्णालयांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे, असं सरकारी रक्तपेढीतील एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

‘मुंबईत दररोज किमान ९०० युनिट रक्ताची गरज लागते. लॉकडाऊनमुळं हे प्रमाण ४०० ते ४५० युनिटवर आलं आहे. ही गरज विचारात घेतली तरी आपल्याकडं केवळ ९ ते १० दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. शिवाय, येणाऱ्या काळात रक्ताची मागणी वाढणार आहे. केवळ थॅलेसेमियाच नव्हे कॅन्सरच्या रुग्णांनाही रक्ताची गरज लागणार आहे,’ असं थिंक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनय शेट्टी यांनी सांगितलं.

समाधानाची बाब म्हणजे, गृहनिर्माण सोसायट्यांकडून सरकारी व सामाजिक संस्थांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक सोसायट्या जवळच्या रक्तपेढ्यांशी संपर्क साधत आहेत. रक्तदान शिबीर घेऊ इच्छिणाऱ्या सोसायट्यांनी ०९८२०१ ४६४४८ या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *