राज्यात आज टोलवसुलीला सुरुवात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात बंद करण्यात आलेली टोलवसुली रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सरकारकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, टोलनाक्यांवर होणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे या नियमाला हरताळ फासला जात होता. या पार्श्वभूमीवर ३० मार्चपासून राज्य सरकारने टोलवसुली बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुलीला सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, वाहतूक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे आता टोलवसुलीला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर वाहनचालक काय पवित्रा घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, उद्यापासून राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागांमध्ये परिस्थितीनुसार उद्योग-व्यापार सुरु करण्यात येतील. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, DTH केबल सर्व्हिस आणि आयटी कंपन्यांचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मनरेगा आणि सिंचन प्रकल्पांच्या कामाला सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *