मुलगी पाहण्यासाठी आले अन् लग्नच करून गेले

जगभर पसरलेल्या करोना विषाणूचे संकट भारतातही आले आहे. यामुळे सर्व जगातील जनसामान्यांना घरातच थांबावे लागत आहे. औरंगाबादमध्येही सर्व शाळा, कॉलेज, मॉल, मंगल कार्यालये बंद करण्याचे आदेश आहेत. मार्च महिन्यापासून लग्न समारंभाच्या आयोजनाची लगबग सुरू होते, परंतु करोना विषाणूमुळे लग्न कार्य पुढे ढकलावी लागत आहेत. यातच औरंगाबादच्या खोकडपुरा येथील सुनील पुणेकर यांची मुलगी प्रियंकाला पाहण्यासाठी गुरुवारी अंमळनेर येथील मुलगा अक्षय राजेंद्र आहिरे तीन – चार नातेवाईकांसह आले होते. यावेळेस मुला-मुलीची पसंती झाली. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा विचार; तसेच लग्नाचा इतर खर्च न करता मुलगी बघण्याच्या कार्यक्रमातच लग्न करून घ्यावे, असा मानस मध्यस्थ सुरेश पवार यांनी बोलून दाखवला. यासाठी मुलगी आणि मुलाकडील नातेवाईकांनी होकार दर्शविला आणि कोणत्याही प्रकारचा हुंडा न घेता अत्यंत साध्या पद्धतीने प्रियंका आणि अक्षयचा विवाह पारंपरिक पद्धतीने एकमेकांना हार घालून झाला. यासाठी औरंगाबाद सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष संतोष सोमवंशी कार्यकारी मंडळ, नगरसेवक रामेश्वर भादवे, सतिष कटकटे, सुनिता सोनवणे आदी उपस्थितांनी पुढाकार घेतला व वधु वरास आशिर्वाद दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *