जादा परताव्याचे आमिष दाखवून ३५ गुंतवणूकदारांची ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीचा मालक मोहमद हुसेन, व्यवस्थापक मुमताजआलम शेख यांच्याविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे येथील कापूरबावडी भागात मोहमद याने चार वर्षांपूर्वी ‘रिदास इंडिया प्रॉपर्टीज’ या कंपनीचे कार्यालय सुरू केले. या कंपनीच्या माध्यमातून त्याने जादा परताव्याच्या योजना सुरू केल्या होत्या. त्यामध्ये ५० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास महिन्याला २ हजार रुपये आणि १ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास महिना ४ हजार रुपयांचा परतावा मिळेल. तसेच १८ महिन्यांच्या मुदत ठेवीवर दुप्पट परतावा, अशा विविध योजनांचा समावेश होता.
या योजनेत ३५ गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले होते. या गुंतवणुकीनंतर त्यांना ठरल्याप्रमाणे परतावा मिळत नव्हता. अखेर या गुंतवणूकदारांनी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रारी केल्या. त्याआधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात मोहमद हुसेन आणि मुमताजआलम शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्य़ात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या गुन्ह्य़ाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.