बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात उच्च न्यायालयाकडू दिलासा मिळाल्यानंतर अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आज सकाळी अकरा वाजता जयललीता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी काल सकाळी जयललितांची एकमतानं निवड करण्यात आली. विद्यमान मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी जयललिता यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ज्यावर सर्व आमदारांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं. त्यानंतर जयललिता यांनी राज्यपाल के. रोसैय्या यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला.
जवळपास आठ महिने जयललिता सार्वजनिक जीवनापासून दूर होत्या. काल सकाळी त्यांनी पक्षाचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण केला. यावेळी आपल्या आवडत्या नेत्याची एक झलक बघण्यासाठी अवघ्या चेन्नईचे रस्ते अण्णा द्रुमकच्या कार्यकर्त्यांनी फुलून गेले होते.