ठाणे खाडी परिसर हे दुसरे अभयारण्य म्हणून ओळखले जाणार

 ठाणे खाडी परिसर हे दुसरे अभयारण्य म्हणून ओळखले जाणार

सुमारे लाखभर पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेला ठाणे खाडी परिसर राज्य सरकारने ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापाठोपाठ मुंबईतील हे दुसरे अभयारण्य म्हणून ओळखले जाणार आहे. या निर्णयामुळे हा परिसर आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यास वाव मिळणार असून, ठाणे खाडी परिसरासह विक्रोळी, भांडुप, कांजूर, मुलुंड या भागातील पाणथळ जागी बांधकामासाठी परवानगी मिळावी म्हणून टपून बसलेल्या बिल्डर लॉबीचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने ६ जुलै २०१५ रोजी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार तब्बल १६.९०५ चौ.कि.मी.चा भूभाग फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून गणला जाईल. त्यात मुलुंड, विक्रोळी, भांडुप, कांजूर, कोपरी, तुर्भे गावाची सीमा, नाहूर, सायन-पनवेल महामार्ग तसेच मंडालेतील भूभाग समाविष्ट असेल.

 ठाणे खाडी परिसरात सुमारे दोन लाख पक्ष्यांचे अस्तित्व होते. मात्र, पाणथळ जागांवर टाकण्यात आलेला भराव आणि अतिक्रमणांमुळे हे प्रमाण एक लाखावर आले आहे. आता खाडी परिसराला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा मिळणार असल्याने या संपूर्ण परिसरातील अतिक्रमणे राज्य सरकारला हटवावी लागणार आहेत. परिसरातील अधिकृत बांधकामांचीही अन्यत्र व्यवस्था करावी लागणार आहे. या परिसरातील जमिनीवरील बांधकामांचे स्वरूप, व्याप्ती यांची चौकशी करण्यासाठी व त्यांची निश्चिती करण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, मुंबई उपनगर, जिल्हा मुंबई उपनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे खाडी परिसर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून जाहीर होणे हे ‘रामसार’ या जागतिक पातळीवरील चळवळीचे तर, महाराष्ट्रातील ‘वनशक्ती’ ही संस्थेने उभारलेल्या लढ्याचे मोठे यश मानले जात आहे. जगभरातील पाणथळ जागा तसेच पक्षांचे अधिवास वाचवण्यासाठी इराणमधील ‘रामसार’ या संस्थेने मोठी चळवळ उभारली होती. जगभरातील ३४ देश या संस्थेचे सभासद असून, त्यात भारताचाही समावेश आहे. ज्या परिसरात २० हजारांपेक्षा जास्त पक्षांचा अधिवास असतो ते क्षेत्र संरक्षित क्षेत्र म्हणून ओळखले गेले पाहिजे, असा या संस्थेचा मानक आहे.

मुंबई आणि परिसरातील पाणथळ जागा वाचव्यात, पर्जन्य वृक्षांचे (रेन ट्री) संरक्षण व्हावे, विक्रोळी डम्पिंग ग्राउंड, उरणमधील पाणस्थळ जागा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने टाकलेल्या भरावामुळे स्थानिक मच्छिमारांवर आलेले संकट, खेटून बांधलेल्या काँक्रीटच्या चौथऱ्यामुळे मरणपंथाला लागणारे वृक्ष आदी विविध विषयांवर सातत्याने कोर्टात लढा देणारी ‘वनशक्ती’ ही संस्था सन २०११ पासून ठाणे खाडी क्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित करावी यासाठी पाठपुरावा करत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *