वाढदिवशीच त्याला गाठले मृत्यूने

सातारा महामार्गावर सोमवारी रात्री १२.३० च्या सुमारास दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तळजाई टेकडीवर सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता तीन मोटारसायकलवरुन ८ जण गेले होते. वाढदिवस साजरा करून दर्ग्याचे दर्शन घ्यायला जाताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे आले असताना पाठीमागून सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकची त्यांच्या तीनही मोटारसायकलला धडक बसली. यामध्ये तीघांचा मृत्यू झाला.

सुशील कांबळे या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मित्र जमले होते. सोमवारी रात्री तळजाई टेकडीवर सर्वजण वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवर गेले होते. रात्री १२ वाजाता त्यांनी केक कापून सुशीलचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दर्ग्याला दर्शन घेण्यासाठी ते सर्वजण निघाला. मात्र, शिवापूर फाट्यानजीक कोंढणपूरजवळ ट्रकने चिरडले.

मृत सुशील कांबळे यांच्या वहिनी पूनम यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, सुशील यांचा आम्ही दरवर्षी वाढदिवस साजरा करायचो. आज देखील आम्ही घरातील सर्वजण एकत्रित वाढदिवस साजरा करणार होतो. त्याविषयी घरात आम्ही चर्चा देखील केली. तर त्याअगोदर सोमवारी रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास आम्हाला सांगितले की, मित्र आलेत केक कापून येतो. त्यानंतर ते बाहेर गेले आणि तासाभराने आईंना फोन केला की खेड शिवापूर येथे जाऊन येतो. त्यावेळी शुभम एवढ्या रात्रीच जाऊ नकोस. त्यावर शुभम म्हणाला की आई तासाभरात जाऊन येतो काही काळजी करू नकोस, असे सांगून गेला तो आलेच नाही. असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

या अपघातात अनिकेत रणदिवे, सुशील कांबळे, सुरेश शिंदे यांचा मृत्यू झाला. करण जाधव, राकेश कुऱ्हाडे, अमर कांबळे, चेतन लोखंडे हे जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. हे तरुण तळजाई परिसरात राहणारे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *