वडापावातून विषबाधा; विक्रेत्यावर गुन्हा दाखल

 वडापाव खाल्ल्यानंतर तिघांना उलट्या, मळमळण्याचा त्रास झाला. महात्मा फुले पोलिसांनी वडापाव विक्रेत्यावर वडापावातून विषबाधाझाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

उघडे आणि शिळ्या पदार्थातून विषबाधा होण्याचे प्रकार सर्रास घडत असतानाही नागरिकांना उघड्यावरील पदार्थ घेण्याचा मोह आवरत नाही. यामुळेच रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाड्या आणि वडापाव, पावभाजी सेंटरवर दिवसभर मोठी गर्दी असते. कल्याणमध्ये राहणारे संजय भोदादे, प्रवीण वाघ आणि कारभारी पवार या तिघांनी बुधवारी संध्याकाळी कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात असलेल्या रुचिरा वडापाव सेंटरमधून वडापाव घेऊन खाल्ले. यानंतर काही वेळातच त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यातील संजय भोदादे आणि प्रवीण वाघ यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून कारभारी पवार यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी वडापाव विक्रेत्यावर गुन्हा दाखल करत याची माहिती फूड अॅण्ड ड्रग्स विभागाला दिली आहे. याबाबत रुचिरा वडा पावचालक हरीश प्रभू यांनी वडा पाव खाऊन विषबाधा झालेली नसून त्यांनी दुसरे काही तरी खाल्ले असेल. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर सत्य समोर येईल, असे संगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *