रिक्षाचालकाचा रस्त्यात मृत्यू, पोलीस,इमरजेन्सी सेवा अनुपलब्ध

रिक्षा चालवत असतानाच रिक्षाचालकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वर्सोवा येथील वाकोला पुलावर घडली आहे. रिक्षातील प्रवाशांनी तातडीने पोलिसांना कॉल केला ( १००) तसंच मेडिकल इमसरजन्सी नंबर १०८वरही संपर्क करण्याचा  प्रयत्न केला. पण पोलिसांकडून किंवा मेडिकल इमरजन्सी नंबरवरून त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही.

प्रशांत गवाणकर असं मृत रिक्षाचालकाचं नाव आहे. आनंदिता कुव्हूर आणि त्यांच्या बहिणीने वांद्रा येथून ही रिक्षा पकडली होती. दोघी मरोलला जात होत्या. रिक्षा वाकोला पुलावरून जात असताना अचानक रिक्षाचालक कोसळला. दोन्ही बहिणींनी लगेच पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांकडून काहीच मदत मिळाली नाही. मेडिकल इमरजन्सी नंबरपर्यंतही दोघी पोहोचू शकल्या नाहीत. अखेर त्याच पुलावरून जाणाऱ्या अफरोज पटेल नावाच्या फिजीओथेरेपिस्टने तिची दुचाकी थांबवली. तिने गवाणकर यांच्यावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला . पण परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे समजताच अफरोजने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

त्याचवेळी भाभा रुग्णालयाची एक रुग्णवाहिका तिथून जात होती. रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे रुग्णवाहिकेचा चालकही गवाणकर यांना रुग्णालयात नेण्यास तयार झाला. आनंदिता कुव्हूर त्यांची बहीण आणि अजून एक इसम गवाणकर यांना घेऊन रुग्णवाहिकेतूनच भाभा रुग्णालयात पोहोचले. भाभा रुग्णालयात गवाणकर यांना मृत घोषित करण्यात आलं.

या सगळ्या घटनाक्रमात प्रशासकीय व्यवस्थेकडून किंवा पोलिसांकडून कोणतीही मदत मिळाली नाही. मेडिकल इमरजन्सीचा नंबर लागलाच नाही. पोलिसांकडूनही कोणतीच मदत वेळेवर पोहोचली नाही. राज्य आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यांनी याप्रकाराबद्दल मौन बाळगलं आहे. तेव्हा एखाद्या आपात्कालीन स्थितीला झुंज देण्यासाठी मुंबईची आरोग्य व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा खरोखर सक्षम आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *