‘एअर इंडिया’चेहीे पगार थकणार?

आर्थिक अडचणींमुळे अस्तित्वासाठी झगडत असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरनंतर पगार मिळणे कठीण ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एअर इंडियाचा निधी झपाट्याने घटत असल्याने ही स्थिती उद्भवू शकेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या या कंपनीला सरकारतर्फे यापूर्वीच सात हजार कोटी रुपयांची सॉव्हरिन हमी देण्यात आली आहे. यापैकी केवळ २,५०० कोटी रुपये सध्या शिल्लक असून या निधीचाही विविध कारणांसाठी लवकरच विनियोग करावा लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराची देयके सप्टेंबरपर्यंतच निघू शकतील. ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांचे पगार देणे कठीण होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. अडीच हजार कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेपैकी बरीचशी रक्कम ही इंधन कंपन्या, विमानतळ ऑपरेटर्स आणि पगार खात्यावर खर्च करावी लागेल. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे मासिक पगार देयक ३०० कोटी रुपयांचे असून पगाराव्यतिरिक्तचे खर्च पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती अन्य एका अधिकाऱ्याने दिली. मे चा पगारही १० दिवस विलंबाने देण्यात आला होता, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *