सामूहिक आत्महत्येचा महिलांचा इशारा

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील दारू दुकान स्थलांतरीत करा अशी मागणी वारंवार करूनही कुठलीच कार्यवाही होत नसल्याने संतप्त महिलांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलन करूनही कार्यवाही होत नसल्याने या महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जानोरी गावातील एका व्यक्तीचा दारुमुळे सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे गावातील दारू दुकान बंद करावे अन्यथा इतरत्र स्थलांतरीत करावे, या मागणीसाठी महिलांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर महिनाभर हे दुकान बंद करण्यात आले. हे दुकान स्थलांतरीत करण्यासाठी दिंडोरी पोलिसांच्या मध्यस्थीने पाच महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु, तरीही हे दुकान स्थलांतरीत केले गेले नाही. याबाबत पोलिसांना विचारणा करणाऱ्या महिलांना तुमच्यावरच गुन्हे दाखल करू असे धमकावण्यात आले. गाव दारूमुक्त व्हावे यासाठी महिलांनी अभियान राबविण्यास सुरुवात केली असून, दुकानचालक गावातील काही व्यक्तींना हाताशी धरून महिलांना शिवीगाळ करीत आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलिस याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने महिलांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी शैला उफाडे, ममता वाघमारे, अलका पवार, सुमन घोरपडे, रेखा मंजुळकर, सिंधूबाई धोंगडे, अलका साबळे, कचाबाई चारोस्कर, अलका चारोस्कर आदी महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *