मानवतेसाठी ती धावतेय काश्मीर ते कन्याकुमारी

भारतातील काश्मीर ते कन्याकुमारी असे सुमारे ४ हजार किलोमीटर अंतर….हे अंतर १०० दिवसांत पार करण्यासाठी ती धावतेय….तिचं हे धावणं व्यक्तिगत ध्येयासाठी नाही…देशात शांतात नांदावी व नागरिकांमध्ये मानवता बंधुत्व वाढावे हा उदात्त हेतूने ती धावतेय…न थांबता…न थकता…ही कहाणी आहे राजस्थान अजमेर येथील ३३ वर्षीय सुफिया खान या तरुण महिला धावपटूची. एका अनोख्या उद्देशाने धावणाऱ्या या सुफियाचे बुधवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. महामार्गावरून धावणारी सुफिया अनेकांशी संवाद साधत असून, मानवतेचा संदेश देत पुढे जात आहे.

बुधवारी जेव्हा सुफिया मालेगाव तालुक्यातील झोडगे गावानजीक पोहचली तेव्हा छायाचित्रकार मुकुंद थोरात, संदीप देसले, डॉ. गर्दे आदींसह ग्रामस्थांनी तिचे स्वागत केले. काही अंतर तिच्यासोबत धावत तिला प्रोत्साहित केले. यानंतर सायंकाळी तिचे मालेगावी आगमन झाले त्यावेळी देखील महामार्गावर अनेक ठिकाणी तिचे स्वागत करण्यात आले. १० वर्षांपासून विमान बनविण्याच्या व्यवसायात असलेली सुफियाला कामाच्या व्यापात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव झाली. आरोग्यासाठी धावणे सुरु केले आणि नंतर तोच तिचा छंद झाला. अनेक लहान मोठ्या स्पर्धेत महिला धावपटू म्हणून सहभागी होत तिने मार्च २०१८ मध्ये आपल्या कर्तृत्वावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. नेहमीच नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ती सज्ज असते. आता तिने देशभरात मानवता, एकात्मा, शांती, समतेचा संदेश देण्यासाठी धावायला सुरुवात केली आहे.

आपल्या या अनोख्या प्रयत्नाबद्दल सांगताना सुफिया म्हणाली, शंभर दिवसात मी काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर पार करण्याचे धेय्य निश्चित केले आहे. यासाठी रोज किमान ५० किमी धावणार असून, २१ एप्रिलपासून मी प्रवास सुरू केला आहे. आपल्या देशात मानवता व शांतीचा संदेश देण्याचा सगळ्यात चांगला मार्ग मला धावणे वाटतो. कारण यामुळे देशातील अनेक प्रांत, भाषा, संस्कृती जाणून घेत माणसांशी संवाद साधता येतो. अलीकडे आपली संस्कुती, मूल्य, बंधुत्व एकमेकांविषयीचा आदर आपण विसरतो आहोत. मी लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या या प्रवासात स्थानिक नागरिक, धावपटू, सायकलपटू यांच्याकडून खूप प्रेम मिळतेय. धावणे हेच माझे आयुष्य असून माझ्या पालकांनी मला प्रोत्साहित केल्याने मी हे करू शकले आहे. देशातील सर्वात वेगाने काश्मीर ते कन्याकुमारी अंतर पार करणारी महिला होण्याचे माझे धेय्य असल्याचे तिने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *