सततच्या पावसाने तापमानात मोठी घट

शहर आणि परिसरात बुधवारी दिवसभर अधूनमधून पावसाने हजेरी लावल्याने शहारातील कमाल तापमानात मोठी घट झाली. शहरात बुधवारी ३१.२ अंश सेल्सिअस कमाल तर २५.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सायंकाळपर्यंत दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज, गुरुवारी मेघगर्जनेसह काही भागात पावसाची शक्यता आहे.

बुधवारी मान्सूनची आगेकूच न झाल्याने मान्सून कन्नूर, मदुराईपर्यंतच स्थिर राहिला. मात्र वायू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुजरात, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. बुधवारी सायंकाळपर्यंत राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी येथे (४५ मिमी) झाली. महाबळेश्वर येथे १८, मालेगाव येथे ८, सातारा येथे २, मुंबई येथे १३ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम होती. मात्र, तेथे पावसाने हजेरी लावली नाही. पुण्यात मंगळवारी ३६.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. मंगळवारी रात्री, बुधवारी झालेल्या पावसामुळे बुधवारी कमाल तापमानात मोठी घट झाली आणि कमाल तापमान ३१.२ अंश सेल्सिअसपर्यंत उतरले. त्यामुळे हवेत काहीसा गारवा जाणवत होता. पुढील दोन दिवसात राज्यात कोकणात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यांसह, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुण्यात आकाश ढगाळ राहून काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlinesfrom India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *