कर्जत शहरामध्ये गवंडी गल्ली येथे रात्री घराच्या गच्चीवर खेळत असताना आर्यन विनय कुमार निषाद (वय सात वर्ष) व जान्हवी विनय कुमार निषाद (वय तीन वर्ष) या दोघांना विजेच्या प्रवाहाचा धक्का बसला आणि हे दोघे बहीण भाऊ जागीच ठार झाले. या घटनेमुळे परिसरात व शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना समजताच अनेक नागरिक उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे जमा झाले होते.
मूळचे उत्तर प्रदेशमधील असलेले विनय कुमार निषाद हे घराला रंग देण्याचे काम करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी ते उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात आले आहेत. रोज मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात.
नेहमीप्रमाणे विनय कुमार हे कामावर गेले होते. घरांमध्ये त्यांची पत्नी व दोन मुले होती. संध्याकाळी मुलांची आई घरामध्ये स्वयंपाकाचे काम करत असताना ही मुले घराच्या गच्चीवर खेळत असताना अनवधानाने विजेचा प्रवाह असणारी वायर त्यांच्या हातामध्ये आली. क्षणाचाही विलंब न होता दोघांनीही हातामध्ये पकडलेल्या वायरचा विजेचा जोरदार धक्का त्यांना बसला यावेळी ते शेजारील घराच्या पत्र्यावर उडून गतप्राण झाले.