दोन वर्षांत ५ हजार ११९ मुली शाळाबाह्य

कष्टकरी पालकांमुळे सातत्याने होणारे स्थलांतर, दुर्बल आर्थिक परिस्थिती, मोफत शिक्षण असूनही लहान वयात हाती आलेले काम, मुलींची असुरक्षितता यामुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत नववी व दहावीच्या ५ हजार ११९ मुली शाळाबाह्य झाल्याची नोंद आहे. यामुळे प्रगतिशील शिक्षणाच्या वाटेवर सावित्रीच्या लेकींची शिक्षणाची वाट खडतर होत आहे.

बालमजुरीवर नियंत्रण आणत तसेच सिग्नलवरील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याचे कागदोपत्री दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात आजही मुलींची शिक्षणाची पाटी कोरी असल्याचे दिसून येत आहे. अनेक शाळांमध्ये मुलींची नावनोंदणी आहे, शाळाबाह्य मुलींना शाळेत नाव दाखल केले जाते. मात्र प्रत्यक्षात काही दिवसांनतर मुली शाळेत जात नसल्याचेच वास्तव आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळ्याबाह्य मुलींचा आकडा कमी दिसला, तरी प्रत्यक्षात हजेरीही कमी असल्याचे दिसून येते.

एकीकडे प्रशासन ठाण्यात स्थलांतरित कुटुंबीयांची संख्या अधिक असल्यामुळे शाळाबाह्य मुलींची संख्या अधिक दिसत असल्याचे सांगते. मात्र प्रत्यक्षात अनेक कारणांमुळे मुली शाळेत जात नसल्याची परिस्थिती आहे. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये मुली आघाडीवर आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक उपक्रम योजना राबवूनही प्रगतिशील महाराष्ट्रात शाळाबाह्य मुलींची संख्या नक्कीच मोठी आहे. जिल्हा परिषद एकीकडे पटसंख्या वाढावी म्हणून प्रयत्न करत असताना दुसरीकडे नववी आणि दहावीच्या शाळाबाह्य मुलींची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. नापास होणे, स्थलांतर, मुलींना देण्यात येणारी दुय्यम वागणूक, सामाजिक रूढी परंपरेचा पगडा, बालविवाह, मुलींची असुरक्षितता, घरची परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे शाळाबाह्य मुलींच्या संख्येत वाढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *