राज्यभरातील तळीरामांचे सध्या चांगलेच वांदे झाले आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून दारूची बेकायदेशीर विक्री आणि निर्मितीला प्रशासनाने आळा घातला. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधीपासून ते मतदानाची वेळ संपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी देशी, विदेशी दारू अथवा ताडीसारखे मद्यसदृश्य पदार्थ यांची विक्री करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.
निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक काळात मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. मतदान व मतमोजणी या काळात तीन दिवस ‘ड्राय डे’ जाहीर करण्याची संबंधित कायद्यात तरतूद आहे. १९५१च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १३५ (सी) नुसार ही मनाई करण्यात आली असून, संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी हे दिवस ‘ड्राय डे’ म्हणजेच ‘कोरडा दिवस’ म्हणून जाहीर केले आहेत. विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ६ ते रविवारी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी (२९ एप्रिल) ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय-डे’ घोषित केला आहे. पण, मुंबईत मात्र सोमवारी सायंकाळी ६ नंतर देशी विदेशी दारूची दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे ठाण्यातील तळीरामांची जास्त गोची झाली आहे. परवानाधारक देशी, विदेशी मद्य, बीअर तसेच ताडीच्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना २७ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजल्यापासून विक्रीला बंदी केली आहे. त्यानंतर, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात २८ एप्रिल तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी आणि मतमोजणीच्या दिवशी म्हणजे २३ मे रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. मुंबईतही याच चार दिवसांमध्ये मद्यविक्रीला बंदी केली आहे. परंतु, तिथे मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ पर्यंत ही बंदी आहे. त्यामुळे ठाण्यात जरी त्यादिवशी सायंकाळी ६ नंतर मद्याची दुकाने बंद असली, तरी मुंंबईत ही सोय होणार असल्यामुळे ठाण्यातील तळीरामांची काहीशी पंचाईत होणार आहे. परिणामी, मुंबईत जर २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ नंतर दुकाने खुली राहण्यास अनुमती असेल, तर ठाण्यातही तशी परवानगी मिळण्यासाठी मद्यविक्रेत्यांकडून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचंही समजतंय.
