कडक उन्हामुळे मुंबईकर बेजार

मुंबई शहर आणि उपनगरात उकाडा वाढला आहे. मुंबईचे सोमवारचे कमाल तापमान ३3.५ अंश सेल्सिअस तर आर्द्रता ८९ टक्के नोंदविण्यात आली. कमाल तापमानाची सरासरी आणि आर्द्रतेमध्ये होणारी वाढ येथील उकाड्यात भर घालत असून, कडाक्याच्या उन्हामुळे घामाघूम मुंबईकर बेजार होऊ लागले आहेत. दरम्यान, राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली. तर, राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

 मुंबई रात्री ढगाळ
मंगळवारसह बुधवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. रात्री आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३३, २३ अंशाच्या आसपास राहील.

मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात १० ते १२ एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता असून मराठवाड्यात ११ एप्रिलला मेघगर्जना, सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४३़८ व सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १८़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
च्पश्चिम राजस्थानात अनेक ठिकाणी, तर पूर्व राजस्थानात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे़ पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाना, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थान येथे तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *