पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार तापला असताना ग्रामीण भागात मात्र तीव्र पाणीटंचाईमुळे कुटुंबांमध्ये वाद उद्भवत आहेत. पाणीटंचाईने त्रस्त चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील शेवटच्या टोकावरील उमरी पठार (ता. आर्णी) गावातील एका तरुणाची पत्नी तीन महिन्यांच्या बाळासह माहेरी निघून गेली आहे. पंधरा दिवस लोटूनही ती घरी यायला तयार नसल्याने पती मात्र मेटाकुटीस आला आहे.
संत डोला महाराज वृद्धाश्रमामुळे प्रसिद्धीस आलेले उमरी पठार गाव सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. दररोज पाणी आणायचे कुठून, हा प्रश्न सतावणाऱ्या सुनांनी माहेरी जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे. रात्री-बेरात्री कधीही रानात पाणी आणायला जावे लागते. म्हणून गावातील शेतमजूर गजाननची पत्नी तीन महिन्यांच्या बाळासह माहेरी निघून गेली. गजाननने विनंती करूनही पाणी समस्या मिटेपर्यंत ती यायला तयार नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील पाणीटंचाई मिटवून आपल्याला सुखाने संसार करू द्यावा, अशी मागणी त्याने केली.
राजेश राठोड याने पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांना लग्नासाठी कोणी मुली द्यायला तयार नसल्याची खंत व्यक्त केली. आपण नात्यातील मुलीला तिला कधीही पाणी भरायला घराबाहेर पाठवणार नाही, असे वचन दिल्यावर ती लग्नास तयार झाल्याचे भीषण वास्तव त्याने सांगितले. गावात नळ योजना आहे. पण त्या कोरडय़ा पडल्या आहेत. दोन विहिरींमध्ये थोडे पाणी आहे, पण त्यातील एक क्षारयुक्त तर एक फ्लोराईडयुक्त पाण्याची आहे. त्यातील पाणी प्यायल्याने गावात किडनीच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. फ्लोराईड पाण्यामुळे लहान मुलं, गर्भवती महिलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मूत्रपिंडाच्या आजारामुळे गावात दरवर्षी तीन ते चार मृत्यू होतात. गावातील किमान २०० लोकांना ‘किडनी स्टोन’चा आजार, अनेकांना त्वचेचे विकार झाले आहेत, अशी माहिती गावात आपल्या मामांकडे राहायला आलेली व नागपूर येथे अभियंता असलेल्या अश्विनी डोंगरे हिने बोलताना दिली.
काही गावपुढारी पैसे घेऊ न स्वत:च्या विहिरीतून खासगी पाणीपुरवठा करत असल्याचा आरोप येथील कीर्तनकार अरविंद महाराज पवार यांच्यासह गावकऱ्यांनी केला आहे. या विरुद्ध आवाज उठवल्याने प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या विहिरीतूनही गावकऱ्यांना आता पाणी देण्यास मज्जाव केलाआहे.
विशेष म्हणजे, उमरी पठार गावापासून १० किमीवर चिरकुटा येथे अरुणावती प्रकल्प आहे, तर गावाच्या खालच्या बाजूस देवगाव प्रकल्प आहे. अरुणावती प्रकल्पातून दिग्रस, आर्णी शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. उमरी पठारपासून तीन किलोमीटर असलेल्या झिरपूरवाडी (ता. दिग्रस) पर्यंत या प्रकल्पातून जलवाहिनी टाकली आहे. त्यामुळे अरुणावती प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून फक्त तीन किमी जलवाहिनी टाकून उमरी पठार येथे कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणे शक्य आहे. मात्र, स्थानिक राजकीय वादात हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.
पंधराशे लोकवस्तीच्या उमरी पठार गावात दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई उद्भवते. मात्र, लोकप्रतिनिधी गावात येऊन बघत नाही. खासदार हंसराज अहीर हे गेल्या पाच वर्षांत एकदाही गावात आले नाहीत, असे गावकऱ्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना एकाही पक्षाचा उमेदवार गावाकडे फिरकला सुद्धा नाही. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी समस्या ऐकून घेत नाहीत, त्यामुळे गावातील समस्या कोणासमोर मांडायच्या, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे ‘पहिले पाणी, नंतर मत’ अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टोकावर असल्यानेच शासन, प्रशासनाकडून गाव बेदखल झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनीच आता पुढाकार घेऊ न गावातील पाणीसमस्या कायमची सोडवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
पाणी विक्रेत्यांचे फावले
गावातील पाणीटंचाईमुळे परिसरातील पाणी विक्रेत्यांचे फावले आहे. गावात दररोज दीडशे बॅरल पाणी विक्री होते. एक बॅरल साधरणत: २० ते २५ रुपयांना विकले जाते. पिण्यासाठी पाणी विकत घेण्याशिवाय पर्यायच नसल्याचे रवि वाघमारे यांनी सांगितले.
गुरांनाही पिण्यासारखे पाणी नाही
या गावात प्रत्यक्ष भेट दिली असता, गावाला मिळणारे पाणी जनावरांनाही पिण्या लायक नसल्याचे आढळले. एका नाल्यातील खड्डय़ातून उपसा करून पाणी ग्रा.पं.च्या विहिरीत आणले जात होते. तेथून गावात येते. हा खड्डा म्हणजे जनावरे, कुत्र्यांच्या लोळण्याची जागा. याच खड्डय़ात गावातील मृत लोकांची राख शिरवली जाते. तेथे पाझर (झरा)असल्याने तेथून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी अत्यंत गढूळ आणि दूषित होते. मात्र, पाणी नसल्यापेक्षा मिळते ते पाणी काय वाईट आहे, या भावनेतून हे पाणी भरण्यासाठीही लोकांची झुंबड सुरू होती.