दिवाकर गंधे य़ांचे निधन

पासष्ट वर्षांहून अधिक काळ साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट समीक्षक दिवाकर गंधे (८०) यांचे शुक्रवारी सायंकाळी डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. मागील दोन आठवड्यांपासून प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मावळली.

शासकीय नोकरी सांभाळून स्वतःची आवड जोपसण्यासाठी दिवाकर गंधे यांनी लेखनास सुरुवात केली. मूळ जळगाव येथील गंधे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. नोकरीनिमित्ताने मुंबईत आल्यानंतर त्यांनी आपले लिखाण सुरूच ठेवले. शासकीय नोकरीत असताना लोकराज्य या शासनाच्या मासिकाच्या संपादकपदाची धुरा त्यांनी सांभाळली. साचेबद्ध लिखाण न करता लोकराज्यला अधिक दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण स्वरूप देण्यासाठी विशेषांकांची सुरुवात त्यांनी केली. रवींद्रनाथ टागोर, ज्ञानेश्वरी असे त्यांनी संपादित केलेले लोकराज्यचे विशेषांक गाजले होते. धुंदस्वर, रजतपटावरील सुवर्णाक्षर, शतककृतु यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपट तसेच नाटकांचे समीक्षण हा त्यांचा आवडीचा विषय होता. मिरज येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांच्या हस्तलिखितांचा संग्रह प्रकाशित झााला होता.

त्यांनी २० वर्षांपूर्वी नेरळ येथे मुक्काम हलविला होता. त्यानंतरही न थकता नेरळ येथील साहित्यवर्तुळात ते कार्यरत होते. नेरळमधील संस्था, युवा कलाकारांना मार्गदर्शन करतानाच कवीसंमेलन, संस्थांचे कार्यक्रम यांमध्येही ते उत्साहाने सहभाग होत. आप्तस्वकीयांसह साहित्य वर्तुळातील मान्यवरांनी एकत्र येत २६ सप्टेंबर २०१८ला त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला होता. मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *