मुंबई आणि ठाणे परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या १६ वर्षीय मुलाला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. त्याच्याकडून आठ दुचाकी आणि एक रिक्षा अशी नऊ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तो मौजमज्जेसाठी वाहनांची चोरी करून त्याची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. त्यापाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी मध्यरात्री पोलीस निरीक्षक सचिन गावडे पथकासह कळवा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दुचाकीवरून संशयास्पदरित्या जाणाऱ्या एका मुलाला पथकाने अडवले. विचारपूस केली असता, तो समाधानकारक उत्तरे देत नसल्यामुळे पथकाने त्याची कसून चौकशी केली. त्यामध्ये त्याने वाहन चोरीच्या गुन्ह्य़ाची कबुली दिली. त्याने मुंबई आणि ठाणे परिसरात यापूर्वी ९ वाहने चोरल्याची कबुली दिली असून ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. तो चोरलेली वाहने आठ ते १० हजार रुपयांत विकत असे तो दहावी नापास असून मौजमजेसाठी चोऱ्या करत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
