मच्छर अगरबत्तीमुळे गेले वृद्धाचे प्राण

मच्छर दूर पळविण्यासाठी पेटविण्यात आलेली अगरबत्ती अंथरुणावर पडून लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या ६० वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना येवल्या तालुक्यातील पाटोदा येथे घडली. मच्छर चावल्याने होणारे आजार टाळण्यासाठी केलेले प्रयत्न अखेरीस या वृद्धाच्या मृत्यूचे कारण ठरले. या प्रकरणी येवला तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शांताराम भिकाजी पगारे (वय ६० रा. पाटोदा, ता. येवला) असे या वृद्धाचे नाव आहे. डासांचा उपद्रव टाळण्यासाठी शांताराम पगारे यांनी मंगळवारी (दि.५) रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बिछाण्याजवळच अगरबत्ती पेटविली होती. पहाटेच्या सुमारास अचानक पेटती अगरबत्ती पगारे यांच्या बिछाण्यावर पडली. थोड्याच वेळात आगीने रूद्ररूप धारण केले. निद्रावस्थेत असलेले पगारे पहाटेच्या सुमारास अचानक आरडाओरड करू लागल्याने हा प्रकार समोर आला. कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यानंतर त्यांना तत्काळ येवला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्रथमोपचार करून बुधवारी सकाळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र, रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *