न्यायाधीशांवर चप्पलफेक

मागील १४ महिन्यांपासून कारागृहात असलेल्या एका आरोपीला न्यायाधीशांनी आणखी सहा महिने कारागृहात राहण्यास आणि दंड भरण्यास तयार आहेस का, असे विचारल्याने संतप्त आरोपीने पायातील चप्पल काढून न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावल्याचा प्रकार भिवंडी न्यायालयात घडला आहे. चप्पल हुकवल्याने न्यायाधीशांना लागली नाही. मात्र पुन्हा दुसरी चप्पलही भिरकावण्याच्या प्रयत्नात एका महिला वकिलाला ती लागली.

भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील आठ आणि भोईवाडा पोलिस ठाण्यातील दोन अशा एकूण दहा आरोपींना मंगळवारी कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी आणले होते. यातील ८ आरोपींना न्यायाधीश एच. जे. पठाण यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यामध्ये अश्रफ वैजुजमा अंसारी (२२ रा. आमपाडा, भिवंडी) या आरोपीचाही समावेश होता. सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी अश्रफला न्यायालयात हजर केले. यावेळी तो माझी एक विनंती असल्याचे न्यायाधीशांना म्हणाला. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नंतर न्यायाधीशांनी किती महिने कारागृहात आहेस, याबाबत विचारल्यानंतर १४ महिन्यापासून कारागृहात असल्याचे अश्रफ याने सांगितले. न्यायाधीशांनी तू आणखी सहा महिने कारागृहात राहण्यास आणि दंड भरण्यास तयार आहेस का, अशी विचारणा केली. याच गोष्टीचा राग आल्याने अश्रफ याने पायातील चप्पल काढून न्यायाधीशांच्या दिशेने फिरकावली. मात्र न्यायाधीशांनी चप्पल हुकविल्याने दुसरी चप्पल हातात घेऊन न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अश्रफला पकडले. मात्र ही चप्पल एका महिला वकिलाला लागली. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनंतर अश्रफ विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *