UPत साधूंना ५०० रुपये पेन्शन; अखिलेश म्हणाले, रावणालाही द्या!

उत्तर प्रदेशात सर्व निराधार व्यक्तींना महिना ५०० रुपये इतकं पेन्शन राज्य सरकार देणार असून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ साधू-संतांना मिळायला हवा, असे स्पष्ट निर्देश योगी सरकारने दिले आहेत.

राज्य सरकार शेतकरी तसेच वृद्धांना महिना ४०० रुपये पेन्शन देत असून ही रक्कम ५०० रुपये करतानाच या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष कॅम्प आयोजित करण्याचे सरकारने ठरवले असून ३० जानेवारीपर्यंत हे कॅम्प लावण्यात येणार आहेत.

प्रत्येक निराधार महिला, पुरुष आणि दिव्यांग व्यक्तीला महिना ५०० रुपये पेन्शन मिळावे. या योजनेपासून कुणीही वंचित राहू नये. कोणत्याही भेदभावाशिवाय या योजनेची अंमलबजावणी व्हावी, हा आमचा उद्देश असून त्यासाठीच आम्ही ही पावले उचलली आहेत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पेन्शन योजनेसाठी पात्र असूनही पेन्शन मिळत नाही, अशा व्यक्तींची संख्या जवळपास ९ लाख इतकी असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे मुख्य सचिव मनोज सिंह यांनी दिली.

राम-सीता आणि रावणालाही पेन्शन द्या: अखिलेश

साधू-संतांना पेन्शन देण्याच्या निर्णयावरून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारची खिल्ली उडवली. सरकारने साधू-संतांना २० हजार रुपये पेन्शन द्यावे. रामलीलेत काम करणाऱ्या कलाकारांनाही पेन्शन द्यावे. त्यात राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या कलाकारांसोबतच तिजोरीत काही शिल्लक राहिलं तर रावणालाही पेन्शनचा लाभ द्यावा, असा टोला अखिलेश यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *