मुंबईतील ५४२ इमारती रहाण्यासाठी धोकादायक

मुंबईतील ५४२ इमारती रहाण्यासाठी धोकादायक

पावसाळयापूर्वी मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरातील ५४२ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असल्याचे जाहीर केले असून, या इमारती तात्काळ रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेने या सर्व इमारतींना सी-१ वर्गामध्ये ठेवले असून, सर्व रहिवाशांना तात्काळ घरे रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्या दुर्घटना घडल्यास त्याला आपण जबाबदार रहाणार नाही असेही महापालिकेने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

५४२ अतिधोकादायक इमारतींपैकी सर्वाधिक इमारती कुर्ल्यातील एल वॉर्डमध्ये आहेत. कुर्ल्यामध्ये ११६ इमारती मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत. खासगी, महापालिका, म्हाडा आणि सरकारी वास्तूंचा यामध्ये समावेश आहे. फक्त महापालिकेच्या इमारतीमधील रहिवाशांना पर्यायी जागा देण्यात येईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

अलीकडेच म्हाडाने मुंबई शहरातील १४ इमारती अतिधोकादायक असल्याचे जाहीर करत तेथील ५३७ रहिवाशांना तात्काळ संक्रमण शिबिरात स्थलांतरीत होण्यास सांगितले. दरवर्षी पावसाळयापूर्वी म्हाडाकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात १४ इमारीत रहण्यायोग्य स्थितीत नसल्याचे समोर आले.

सध्या मुंबई शहरात १४,८५८ मोडकळीस आलेल्या वास्तू आहेत. या सर्व वास्तूंचे बांधकाम १९६९ पूर्वीचे आहे. म्हाडाकडून या वास्तूंच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. मुंबई आणि शेजारच्या शहरात दरवर्षी पावसाळयाच्या सुमारास इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडतात.

यामध्ये निष्पाप नागरीकांचा बळी जातो. दरवर्षी कोसळणा-या इमारतींपैकी अनेक इमारतींना पालिकेकडून रिकामी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आलेल्या असतात. पण त्यात रहाणा-या रहिवाशांची अन्यत्र पर्यायी व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे रहिवाशी स्वत:चा प्राण धोक्यात घालून अशा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये रहात असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *