तंदूर भट्टीत पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे जाळणाऱ्या सुशील शर्माची सुटका करण्याचे आदेश

नव्वदच्या दशकात संपूर्ण देशात गाजलेल्या नैना सहानी हत्या प्रकरणातील दोषी सुशील शर्माची तात्काळ सुटका करा असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. पत्नी नैना सहानीच्या हत्या प्रकरणात दोषी ठरलेला सुशील शर्मा मागच्या दोन दशकांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. १९९५ साली घडलेल्या या घटनेने अनेकांना हादरवून सोडले होते. हत्या प्रकरणात शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवू शकतो का ? असा प्रश्न न्यायालयाने या आठवडयाच्या सुरुवातीला विचारला होता.

माजी युवक काँग्रेसचा नेता असलेल्या सुशील शर्माने (५६) आपण २९ वर्ष तुरुंगात काढली आहेत त्यामुळे आपली सुटका करण्यात यावी अशी त्याने कोर्टाला विनंती केली होती. आरोपी मागच्या २५ वर्षांपासून कारावासात आहे. त्याने केलेली हत्या अत्यंत क्रूर प्रकारात मोडते. त्याने आधीच शिक्षा भोगली आहे. आता तुरुंगात ठेवणे हे आरोपीच्या मानवी हक्कांवर अतिक्रमण नाही का ? असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

दोषीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवण्याची परवानगी दिली तर हत्येच्या प्रकरणांमध्ये कधीच कोणाची सुटका होणार नाही असे खंडपीठाने म्हटले आहे. सुशील शर्माने पत्नी नैनावर विवाहबाह्य संबंधांचा आरोप केल्यानंतर तिची गोळया झाडून हत्या केली होती. त्यानंतर त्याने पत्नी नैनाच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते तंदूर भट्टीत जाळण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशात तंदूर हत्याकांड म्हणून हे प्रकरण ओळखले जाते.

भारतातील ऐतिहासिक प्रकरणांपैकी हे एक प्रकरण आहे. कारण डीएनए नुमना आणि दुसऱ्या शवविच्छेन अहवालावरुन आरोपीवरील गुन्हा सिद्ध करण्यात आला होता. तुरुंगात असताना आणि पॅरोलवर बाहेर आल्यानंतर आपले वर्तन चांगले होते. कधीही मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा घेतला नाही असे सुशील शर्माने त्याच्या याचिकेमध्ये म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *