राज्यात हुडहुडी, धुळ्यात नीचांकी तापमान

गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईसह राज्यात थंडीचा जोर वाढला असून धुळ्यात तर तापमानात प्रचंड घट झाली आहे. धुळ्यात पाऱ्याने ५ अंशाची पातळी गाठली असून येथील हे गेल्या १७ वर्षातील नीचांकी तापमान असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं. राज्यात सर्वत्र शीतलहर पसरल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या असून उबदार कपड्यांच्या घड्या मोडण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात धुळ्यात थंडीचा जोर सर्वाधिक असून गेल्या चार दिवसांपासून थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. दररोजच तापमानाचा पारा घसरत असल्याने थंडीची लाट आल्याचा अनुभव धुळेकर घेत आहेत. धुळ्याचं तापमान ५ अंशावर गेल्याने येथील जनजीवन विस्कळीत झालं असून धुळ्यातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना लोक दिसत आहेत.

मुंबई-पुण्यातही आज थंडीचा जोर कायम आहे. मुंबईत थंड वाऱ्याची लाट आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईकर मात्र या गुलाबी थंडीची मजा लुटताना दिसत आहेत. औरंगाबाद, नाशिक, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पारा कमालीचा खाली आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पूर्वेकडून उत्तरेकडे वाहणारे वारे ताशी ६ नॉट्सने वाहत असून, त्याचा परिणाम नाशिकमधील वातावरणावर कायम आहे. शहरातील थंडीचा पारा १ अंश सेल्सिअसने घरसला आहे. त्यामुळे शहरात दिवसभर गारठा जाणवला. समुद्रातील वादळी वाऱ्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे, वाऱ्यांचा वेग वाढला असून, येत्या काही दिवसांत थंडीचा पारा आणखी घसरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. निफाडमध्ये पारा ६.६ अंशावर आल्याने पहाटे जाणवणाऱ्या थंडीमुळे ठिकठिकाणी स्वेटर, कानटोप्या घालूनच लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत.
रब्बी पिकांना फायदा
राज्यात थंडीच्या कडाक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी या थंडीचा गहू आणि हरभरा पिकाला फायदा होणार आहे. यंदा पावसाअभावी रब्बी हंगामात कमी प्रमाणात पेरणी झाली आहे. मात्र, थंडीमुळे पेरणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. रब्बीच्या पिकांना ही थंडी पोषक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे थंडीचा त्रास असला तरी पिकांना गुणकारी असलेल्या थंडीने शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *