जिल्हाभर अवकाळी पाऊस

गेल्या आठवडाभरापासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दररोज ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने सूर्याचे दर्शन दुरापास्त झाले आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने थंडीचा जोरही वाढला आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत चालूच होती. आधीच थंडी, त्यात दिवसभर पाऊस त्यामुळे चंद्रपूरसारख्या हॉट शहरातही आज काश्मीरला असल्याची जाणीव होत होती.
चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी उन्हाळा बऱ्यापैकी तापला. सूर्याचा पारा ४८ अंशापार गेला होता. त्यामुळे पावसाळ्यात पाऊसही चांगलाच बरसेल, असा अंदाज होता. मात्र पावसाळ्यात पावसाने दगा दिला. प्रारंभी काही दिवस पाऊस पडल्यानंतर त्याने दडी मारली, ती कायमचीच. परतीच्या वेळीही पाऊस आला नाही. सध्या हिवाळा सुरू असल्याने थंडी पडणे आवश्यक आहे. मात्र असे न होता वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडून आला आहे. मागील आठ दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सुर्याचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व भागात पावसाला सुरूवात झाली. ही पावसाची रिपरिप रात्री ८ वाजेपर्यंत थांबली नाही. ऐन हिवाळ्यात पाऊस बरसत असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अडगळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर निघाले. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील रस्ते सायंकाळच्या सुमारास ओस पडले होते. शासकीय कार्यालयांमध्येही शांतता दिसून येत होती. भरदुपारीच पारा १४ ते १६ अंशापर्यंत खाली पोहचला होता.
रबी पिकांना फटका
या वातावरणाचा शेतपिकांवर मोठा परिणाम झाला असून कापसासह गहू, ज्वारी, हरभरा, तूर पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पिकांवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडींनी पिकांना ग्रासल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहे. खरिपातील पिकांनी शेतकºयांना दगा दिल्यानंतर रब्बी पिके शेतकऱ्यांना तारतील असे वाटत असतानाच अचानक वातावरणात बदल झाल्याने ढगाळ वातावरणाचा अनिष्ट परिणाम पिकांवर होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. परंतु यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघत नाही. आता रबीचेही उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचा संघर्ष व्यर्थ
शेतकरी दिवसरात्र शेतात राबत असतात. हाडाची माती करून जिवाची पर्वा न करता शेतकरी शेतात कष्ट करतात. परंतु त्यांच्या नशिबी अजूनही संघर्षच आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे. आता निसर्गही असा ऋतू सोडून वागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *