बोलणे सोडल्यामुळे प्रेयसीवर चाकूहल्ला चढविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. शुभम (२४) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने सुनीता (नाव बदलले) हिच्यावर प्राणघातक केला. तिच्या मांडीत चाकूने सपासप वार करीत तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून शुभम तेथून निघून गेला. पोलिसांनी घटनेच्या दीड तासातच शुभमला अटक केली. या घटनेमुळे तरुणीचे कुटुंब प्रचंड दहशतीत असून परिसरातसुद्धा एकच खळबळ उडाली आहे.
शुभम हा पेंटर आहे. ही तरुणी एका कॅफेमध्ये काम करते. तिचे वडील सुरक्षारक्षक असून तिची आई गृहिणी आहे. या तरुणीचे आणि शुभमचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात आहे. शुभमने यापूर्वीसुद्धा तिला जबर मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. शुभमच्या या स्वभावाला कंटाळून या तरुणीने त्याच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. बुधवारी त्याने तिला फोन केला होता. परंतु, तिने फोन उचलला नाही. तसेच तो तिला भेटायला आल्यावरसुद्धा ती त्याला भेटली नाही. त्यामुळे चिडलेल्या शुभमच्या मनात तिच्या हत्येचा विचार आला होता. परंतु, नंतर त्याने केवळ दुखापत करून तिला धडा शिकवण्याचे ठरविले, असे त्याने स्वत:च पोलिसांना सांगितले. शुभमने या तरुणीच्या घरासमोरच तिला गाठले आणि तिच्या मांडीत चाकूने सपासप वार केले. यात गंभीर तरुणी जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
कोणीही मदतीला धावले नाही
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी रमण्णा गणवीर यांनी सांगितले की, ‘कोणीही तिच्या मदतीला आले नाही. मी आरोपीला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्याकडे शस्त्र होते. मुलीला चाकूने भोसकल्यावर तो तेथून शांतपणे निघून गेला.’ या तरुणीवर सध्या मेडिकलमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. शुभमने यापूर्वीसुद्धा तिच्यावर हल्ला केला आहे. या तरुणीच्या कुटुंबाने १०० क्रमांकावर तक्रार केली होती. परंतु पोलिसांना गांभीर्याने घेतले नाही, असे नातेवाइकांकडून कळले.
