रावण दहनच्यावेळी भीषण रेल्वे अपघात झालाय. रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक जण रेल्वे रुळावर येऊन उभे होते. त्याच वेळी वाऱ्याच्या वेगानं येणाऱ्या जालंदरहून अमृतसर मेलनं रुळावर उभे असलेल्या अनेकांना चिरडलं. या अपघातात किमान ५२ जणांचा मृत्यू झाला असून ७२ जण जखमी झालेत. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
पाच लाखांची मदत
घटना घडली त्यावेळी समोरच्या बाजुनंही दुसरी गाडी आल्यामुळे लोकांना पळायला संधीच मिळाली नसल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केलीये. तर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी अमेरिकेतले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून मायदेशाकडे धाव घेतली आहे.
अपघातानंतर राजकारण
दुसरीकडे यावरून राजकारणही सुरू झालाय. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नी नवज्योत कौर अपघातानंतर गाडीत बसून निघून गेल्याचा आरोप काही जणांनी केला. मात्र आपण पळून गेलो नाही, तर जखमींना घेऊन रुग्णालयात आल्याचा दावा कौर यांनी केलाय.
