तलावांचे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी आणि गणपती उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी रविनगर येथील सी.पी.अॅण्ड बेरार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईको फ्रेंडली गणपतीची संकल्पना रुजविली. त्यासाठी त्यांनी पंचगव्यापासून गणपतीची निर्मिती केली.
प्रहार मिल्ट्री स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय ईको फ्रेंडली गणपती स्पर्धेत सी.पी.अॅण्ड बेरार हायस्कूलचे सात विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत रितीक सुभाष व्यंकट या विद्यार्थ्याने दूध, दही,मध, तूप, गोमूत्र आदींचा वापर करून, गणेशाची निर्मिती केली. फूल, पाकळ्यांपासून रंग तयार केले. तुरटी, शेण आदींचाही वापर या गणपतीच्या निर्मितीसाठी करण्यात आला. या साहित्यातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आकर्षक गणरायाच्या कलाकृती साकारल्या. सोबतच एक झाड एक गणपती ही संकल्पना रुजविण्यासाठी त्यांनी गणपतीला आवडणाऱ्या मोदकाचा वापर केला. मातीचे मोदक तयार करून, कडुलिंब, चिक्कू, जांभूळ आदी झाडांच्या बिया मोदकांमध्ये टाकल्या. प्रसादाच्या रूपात देण्यात येणारे मोदक विद्यार्थ्यांना देऊन, एक झाड लावण्याचे आवाहन केले. रितीक व्यंकट याच्या नेतृत्वात ईको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक संदेश देणाºया गणपतीचे स्पर्धेत कौतुक झाले. त्याच्या या अभिनव कल्पनेबद्दल त्याला पुरस्कृतही करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका वैदेही गाडे, उपमुख्याध्यापिका अणे, पर्यवेक्षिका देशपांडे यांनी रितीक आणि त्याच्या टीमचे कौतुक केले.