‘बीफ’ खाणाऱ्यांनी पाकमध्ये जावं!

‘बीफ’ खाणाऱ्यांनी पाकमध्ये जावं!

गोमांस खायला न मिळाल्यानं कुणाचा जीव जात असेल, तर त्यांनी पाकिस्तानात, आखातात किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जावं. माणुसकीचा धर्म, मानवतेचे नियम मोडून तुम्हाला या देशात राहता येणार नाही, असं ठणकावत केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गोवंश हत्याबंदीचं जोरदार समर्थन केलं आहे.

महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यांनी गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. हा कायदा देशभरातच लागू करण्याची केंद्रातील मोदी सरकारची इच्छा आहे. परंतु, त्यावरून मोठा वाद उफाळू शकतो. कारण, राज्यांमधील ‘बीफ’बंदीच्या निर्णयाविरोधातच अनेक पक्ष आणि संघटनांनी दंड थोपटले आहेत. ओवेसी बंधूंचा एमआयएम पक्ष त्यात आघाडीवर आहे. रोजगाराचा मुद्दा उपस्थित करून ते या कायद्याला विरोध करत आहेत. धार्मिक रंग देऊन वातावरण पेटवण्याचाही प्रयत्न होतोय. त्यावरून, भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वींनी त्यांना सणसणीत चपराक लगावली.

मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ओवेसी आणि नक्वी आमनेसामने होते. तेव्हा, गोवंश हत्याबंदी ही हिंदूसाठी संवेदनशील बाब आहे. कुणाच्या फायदा किंवा नुकसानीचा हा मुद्दाच नाही, तर हा विषय श्रद्धेचा, आस्थेचा, विश्वासाचा आहे, असं नक्वींनी निक्षून सांगितलं. बीफ न खाल्ल्यानं ज्यांचा जीव जात असेल, त्यांनी पाकिस्तान किंवा अरब देशांत निघून जावं. जिथे गोमांस खाण्यावर बंधनं नाहीत, अशा कुठल्याही कोपऱ्यात जावं, असंही त्यांनी खडसावलं. तेव्हा, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली.

दरम्यान, महाराष्ट्रातील गोवंश हत्याबंदीच्या कायद्यावरून बराच वाद झाला होता. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या कायद्याबद्दल आक्षेप नोंदवला होता. लेखिका शोभा डे यांनी, बीफ खाणाऱ्यांच्या हक्कांसाठी पाच वर्षं तुरुंगात जायला आवडेल, असं ट्विट करून देवेंद्र सरकारला आव्हान दिलं होतं. परंतु, आता हे सगळे शांत झालेत. परंतु, एमआयएम, रिपाइं या पक्षांचा बीफबंदीला विरोधच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *