कानशिलात लगावल्याने श्रवणशक्ती गमावली

कारागिरांना मारहाण केल्याचा जाब विचारणाऱ्या यंत्रमाग व्यावसायिकाला दोघांनी मारहाण करत १५ ते २० वेळाकानशिलात लगावल्याने त्याच्या डाव्या कानाची श्रवणशक्तीच नाहीशी झाल्याचा प्रकार भिवंडीत घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद अश्रफ सलामत शेख (५१ रा. भिवंडी) यांनी भाड्याने यंत्रमाग कारखाना चालवण्यास घेतला. कारखान्यात सात कामगार असून ३१ जुलैच्या रात्री चार कामगार कामावर होते. मध्यरात्री एक कामगार बाहेर गेला होता. त्यावेळी या कामगाराचे मनोज यांच्याशी भांडण झाले. नंतर मनोजने कामगाराला मारहाणही केली. ही बाब शेख यांना समजल्यानंतर सायंकाळी शेख यांनी मनोजची भेट घेऊन मारहाणीचा जाब विचारला असता मनोजने शेख यांना शिवीगाळ करत कानशिलात लगावली. त्याच्या दुसऱ्या साथीदारानेही लाथेने मारहाण केली. शेख यांनी आयजीएम रुग्णालयात उपचार घेतले. पुढील उपचार ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात घेतले. यावेळी डॉक्टरांनी कानाची तपासणी केली असता शेख यांच्या डाव्या कानाचा पडदा फाटून श्रवणशक्तीच नाहीशी झाली होती. यापूर्वी शेख यांनी या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवली. मात्र नंतर मनोज आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *