कारमध्ये यायचे अन् सुटाबुटात घरे फोडायचे

महागड्या कारमध्ये येऊन सुटाबुटात दिवसा बंद घरे फोडणारी उत्तर प्रदेशातील चार जणांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. या टोळीकडून चोरीला गेलेले अर्धा किलो सोन्याचे दागिने, पाऊण किलो चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही टोळी देशभरात चोऱ्या करत होती. त्या दृष्टीने त्यांच्याकडे तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

इरफान इरशाद कुरेशी (वय ३८, रा. माजीदपुरा, हापूड, उत्तर प्रदेश), इनाम मेहमुद कुरेशी (वय ३६, पुराना बाजार, हापूर), अस्कीन बसरुद्दीन मलिक (वय ३५, रा. सिकंदराबाद, बुलंद शहर), इर्शाद अब्दूल रहीम झोजा (वय ४५, गोरखा, सिकंदराबाद, बुलंद शहर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीतील नदीम उर्फ बल्ली कुरेशी फरारी आहे. ही टोळी चोरीसाठी वापरत असलेली हुंदाई कंपनीची कार, कटावणी, स्क्रू ड्राइव्हर हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी या टोळीने राहुरी येथील दोन डॉक्टरांची घरे फोडून सोने, चांदीचे दागिने लुटले होते. ही टोळी चोरी करत असतानाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज पोलिसांना मिळाले होते. या फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी या टोळीचा शोध सुरू केला होता. ही टोळी सातारा, सांगली, बारामती येथे जाऊन पुन्हा मनमाड महामार्गावरून राहुरीकडे येत असल्याची माहिती पवार यांना मिळाली होती. त्यानुसार राहुरी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रोडवर शनिशिंगणापूर फाट्याजवळ सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे, सुधीर पाटील, सोन्याबापू नाणेकर, विष्णू घोडेचोर, मन्सूर सय्यद, योगेश गोसावी, संदीप घोडके, रवींद्र कर्डिले, मनोहर गोसावी, विजय ठोंबरे यांनी बुधवारी रात्री सापळा रचून हुंहाई वेरना कार पकडली. त्यातील चौघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीनंतर ही टोळी गजांआड करण्यात आली. गुरुवारी या टोळीला राहुरीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता अकरा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यात घरफोड्या, दरोडे असे गुन्हे या टोळीने केले आहेत.

गजांआड केलेल्या टोळीतील सदस्य उच्चशिक्षित आहेत. चोरी करण्यासाठी ते आलिशान कारचा वापर करत होते. चांगले कपडे, बुट घालून चोरीसाठी जात होते. अपार्टमेंटमध्ये जाऊन एक जण पाहणी करत असे. त्यानंतर टोळीतील इतरांना बोलवून घेऊन कटावणीच्या साह्याने कुलूप तोडून घरात घुसून सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरून नेत होते. चांगली राहणी, कारचा वापर करत असल्याने त्यांच्यावर कोणाला संशय येत नव्हता. अवघ्या नऊ ते दहा मिनिटांत घर साफ करून टोळी पसार होत होती.

चोरीसाठी विशेष कटावणी

या टोळीने चोरीसाठी विशेष कटावणी बनवून घेतली होती. ती उघडून चोरट्यांना खिशात ठेवता येत होती. कोणताही दरवाजा, कुलूप, कपाटाचे कुलूप अवघ्या मिनिटभरात या कटावणीने तोडता येत होते. पोलिसांनी अशी कटावणी पहिल्यांदाच बघितली आहे. चोरीचे दागिने वाटून घेण्यासाठी त्यांच्याकडे एक छोटे वजन करणारे मशीन मिळाले आहे.

सोन्यासाठी गाडीत व्यवस्था

चोरीचे सोने ठेवण्यासाठी कारमध्येच वेगळी व्यवस्था केली होती. वाहनचालकाजवळ एका कप्पा बनवून त्यात दागिने ठेवता येत होते. त्यामुळे नाकेबंदीत पोलिसांनी गाडी पकडली, तरी पोलिसांना वाहनात काही सापडत नव्हते. त्यामुळे नाकेबंदीत पोलिसांनी वाहने तपासल्याानंतर या टोळीवर संशय येत नव्हता.

या टोळीच्या सदस्यांच्या राहणीमानावरून ते चोर असल्याचा संशय येत नसल्याने ते सहज बंद घर फोडून दागिने, पैसे चोरून नेत होते. चोरी केल्यानंतर ही टोळी दुसऱ्या जिल्ह्यात निघून जात होती. त्यामुळे ही टोळी पकडली जात नव्हती. राहुरी येथे चोरी करून ही टोळी सांगली येथे गेली होती. तेथून पुन्हा नगर जिल्ह्यात आल्यानंतर ही टोळी जेरबंद करता आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *