किटकनाशकांमुळे झाला २४ मोरांचा मृत्यू?

तेलंगणमध्ये २४ मोर मृत अवस्थेत अढळून आल्यामुळे एकच खळबळ उडली आहे. दोन जिल्ह्यांमध्ये मागील दहा दिवसांमध्ये समोर आलेल्या घटनांमध्ये एकूण २४ मोरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नागरकुर्नूल आणि गडवाल जिल्ह्यांमध्ये हे मृत मोर अढळून आले आहेत.

नागरकुर्नूल जिल्ह्यातील गागलापल्ली गावात काही दिवसांपूर्वी स्थानिकांना १४ मोर शेतांमध्ये वेगवेगळ्या जागी मृत अवस्थेत पडलेले अढळून आले. त्यांनी लगेचच याबद्दल गावातील सरपंचांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या मोरांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.

असाच प्रकार गडवाल जिल्ह्यातील जोगूलांबा गावात घडल्याचेही अढळून आले. येथे गावकऱ्यांना १० मोर मृत अवस्थेत अढळले. या घटनेचाही पंचनाम करण्यात आला असून मोरांचे मृतदेह सरकारी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवले आहेत. तपासणी अहवालानंतरच नक्की या सर्व मोरांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती समोर येईल.

 सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पिकांवर किडीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात आलेल्या किटकनाशकांमुळेच या मोरांचा मृत्यू झाला आहे. हा प्राथमिक अंदाज असल्याने नक्की मृत्यू कशामुळे झाला हे पशुवैद्यकीय दवाखान्यातून मोरांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच समजू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *