वर्षभरापूर्वी मराठा आरक्षणासाठी शांततेने ५८ मोर्चे काढले, पण अद्यापही महाराष्ट्राने मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे मूकमोर्चानंतर आता ठोकमोर्चा सुरू झाला आहे. त्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्राने कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांवर आपला दावा केला आहे. त्यामध्ये निपाणी सीमाभागातील मराठा समाजालाही समाविष्ठ करून घ्यावे, या मागणीसाठी निपाणी भाग सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी (ता. २७) निपाणी बंदची हाक दिली आहे. शिवाय सकाळी अकरा वाजता मोर्चा काढून कर्नाटक-महाराष्ट्रातील तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्णयही गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता धर्मवीर संभाजी चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. साखरवाडी, नरवीर तानाजी चौक, शिवाजी पुतळा, बेळगाव नाका, शिवाजीनगरमार्गे तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात येणर आहे. तसेच कागल येथील तहसीलदारांनाही निवेदन दिले जाणार आहे. बैठकीस सुधीर माळवे, मुकुंद रावण, निकू पाटील, नगरसेवक दत्ता जोत्रे, बाळासाहेब जासूद, नवनाथ चव्हाण, संग्राम चव्हाण, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.