विघ्नहर्त्याला मिळणार प्लास्टिकचे छत्र

प्लास्टिकबंदीमुळे शाडूच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांसमोर या मूर्तींच्या रक्षणाचा प्रश्न उभा ठाकला होता. महापालिका आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडेही त्यांनी प्लास्टिक वापरासाठी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी महापालिकेच्या विशेष उपायुक्त निधी चौधरी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती झाकून ठेवण्यासाठी प्लास्टिक आवरणाला परवानगी देण्यात आली आहे. तसेच मूर्ती आगमन आणि विसर्जनाच्या वेळीही मूर्तीला धक्का पोहोचू नये म्हणून प्लास्टिकचे आवरण घालण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शाडूच्या मूर्ती सुकण्यासाठी त्यांच्यावर प्लास्टिकचे आवरण घालणे गरजेचे असते. तसेच गणपती आगमन आणि विसर्जनाच्या वेळी जर पाऊस असेल, तर मूर्तीचे नुकसान होऊ नये, यासाठी प्लास्टिकचे आवरण आवश्यक आहे. मात्र प्लास्टिकबंदीमुळे मूर्तिकारांसमोर प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबतचे संपूर्ण स्पष्टीकरण गुरुवारी चौधरी यांच्यासमोर सादर केल्यानंतर त्यांनी या दोन्ही गोष्टींना मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

या दरम्यान गणपती मंडळांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भातही चर्चा झाली. प्रसादासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नयेत, हा प्रसाद बटरपेपरमध्ये देण्यात यावा, असे महापालिकेने यावेळी स्पष्ट केले आहे. नारळ, फुले आणि इतर प्रसादासाठीही नेहमीच्या प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्यात यावा, अशा सूचनाही महापालिकेतर्फे देण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. यावेळी पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकबंदीचा प्रचार करण्याचे समन्वय समितीतर्फे मान्य करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *