सासू, बायकोच्या छळाला कंटाळला अन्…

सासरच्यांच्या छळामुळे विवाहीत स्त्रीने तक्रार केल्याचे अनेकदा दिसून येते. पण अंधेरीमधील एका तरुणाने पत्नी आणि सासूच्या छळाला कंटाळून स्वत:च्याच अपहरणाचा कट रचला. अविरत तपासानंतर अंधेरी पोलिसांनी त्याला रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून शोधून काढल्यावर हे अपहरणनाट्य उघडकीस आले.

अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पती गणेश जांभळेकर याचे अपहरण झाल्याची तक्रार अंधेरी पोलिस ठाण्यात केली. २९ जून रोजी गणेश घराबाहेर पडला तो १० जुलैपर्यंत घरी परतलाच नाही. ११ जुलै रोजी या महिलेच्या आईच्या मोबाइलवर ‘तुमच्या जावयाचे आम्ही अपहरण केले असून आता त्याला बघून घेतो. तुम्ही पोलिसांत जाऊ नका’. अशा आशयाचा एक मेसेज आला. या मेसेजसोबत गणेशचा हात-पाय बांधलेला आणि तोंडात बोळा कोंबलेला फोटोही पाठवण्यात आला. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. मोबाइलवर पाठवलेला फोटो पाहून काहीतरी काळंबेर असल्याचा संशय पोलिसांना आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने या तरुणाने ज्या ज्या क्रमांकावरून फोन केले त्या लोकांना शोधले. पोलिसांचे पथक कर्नाटकात जाऊन आले. मोबाइल क्रमांकावरून काहींची चौकशी आणि इतर तांत्रिक पुराव्यांवरून गणेश रत्नागिरी जिल्ह्यात असल्याचे समजले. रत्नागिरीतील लांजा येथे गणेशची बहीण राहत असल्याची माहितीही मिळाली. पोलिसांनी लांजा गाठले त्यावेळी गणेश बहिणीकडे मजेत राहात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकाराने पोलिसही चक्राऊन गेले. अखेर त्याला घेऊन पोलिसांनी मुंबई गाठली.

काय म्हणाले गणेश?

 पत्नी आणि सासूपासून सुटका हवी होती म्हणून मी अपहरणाचा डाव रचला. रोज घालून पाडून बोलणे, शिव्या देणे, जेवायला न देणे या नेहेमीच्या कटकटीला मी वैतागलो होतो, असे गणेशनी सांगितले. त्याने सांगितलेली ही हकीगत ऐकून पोलिसही अवाक् झाले. या प्रकारानंतर आता गणेश, त्याची पत्नी आणि सासू यांचे समुपदेशन करण्यात आले.

चित्रपटात शोभेल अशी कहानी

गणेश हा कृत्रिम गालिचे, गवत तसेच अशाप्रकारच्या वस्तूंच्या व्यवसायात होता. महिन्याला लाख ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळत होते. अशातच त्याला लहानपणीची मैत्रिण भेटली. तिचे लग्न झाले होते पण पतीची हत्या झाल्याने ती आईसोबत एकटीच राहात होती. तरुण वयात विधवा झालेल्या मैत्रिणीला पाहून गणेश अस्वस्थ झाला. तिला आधार देण्यासाठी त्याने हात पुढे केला. मैत्रिणीनेही जुन्या मित्राच्या हातात हात दिला. हळूहळू मैत्रिणींचे रुपांतर प्रेमात झाले आणि अखेर दोघांनी लग्न केले. गणेश तिच्या प्रेमात इतका बुडाला की, आईला सोडून तो घरजावई झाला. लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पत्नी आणि सासूने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. पत्नी आणि सासूचे हे रूप पाहून गणेश अस्वस्थ झाला होता. कितीही लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी पत्नी आणि सासू काही पाठ सोडत नव्हत्या. त्यामुळेच कामाचे निमित्त काढून बाहेर पडलेल्या गणेशने हे अपहरणनाट्य रचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *