कोल्हापुरात पूर; आजऱ्यात शेतकरी वाहून गेला

शहरासह जिल्ह्याला पावसाने गुरुवारी दिवसभर झोडपून काढले. सर्वच धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली असून सर्व नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळीही इशारा पातळीच्या दिशेने वाढत आहे. जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे ५० बंधारे पाण्याखाली गेले असून, तेथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

एसटी महामंडळाचीही सहा मार्गावरील वाहतूक अंशतः बंद करण्यात आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. दिवसभरात आजरा, चंदगड, शाहूवाडी तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या असून आजरा तालुक्यातील आंबार्डे येथील एक शेतकरी हिरण्यकेशी नदीत वाहून गेला. शंकर लक्ष्मण कुऱ्हाडे (वय ७५, रा. आंबाडे) असे त्यांचे नाव आहे. पन्हाळा तालुक्यातील बोरगाव येथील तलावाची संरक्षक भिंत कोसळून एकजण ठार झाला. श्रीपती ज्ञानू चौगले (वय ५५) असे त्यांचे नाव आहे.

चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी चांगलाच जोर पकडला. १४ धरणांपैकी १३ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली असून धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरणातील पाणीसाठा ६३ टक्के झाला आहे. पाण्याचा विसर्ग १६०० क्युसेक्स करण्यात आला आहे. त्याचबरोबर कुंभी व कोदे धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता राजाराम बंधाऱ्यावर ३१ फूट नऊ इंचावर असलेली पंचगंगेची पाणी पातळी सायंकाळी ३४ फुटावर पोहोचली. इशारा पातळी ३९ फूट असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पंचगंगा इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात (९१ मि.मी.) झाला.

 शहरात जनजीवन विस्कळीत

शहरातही दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने अगदी क्वचितच उघडीप दिली. अधूनमधून पडणाऱ्या जोरदार सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक रस्त्यांवर पाण्याची डबकी साठल्याचे चित्र होते. दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेतील लगबगही कमी जाणवत होती. पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे जयंती नाल्याचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगेचे पाणी इशारा पातळीच्या दिशेने वाढत असल्याने पहिल्या टप्प्यात दसरा चौकातील सुतारवाडा परिसरात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सतर्क झाली आहे. दर तासाला पाणीपातळीची माहिती घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *