क्षयरुग्णांना हवा मोकळा श्वास

क्षयरोगाबद्दल असलेल्या भीतीमुळे हा आजार लपवून ठेवण्याचा कल वाढता आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपये खर्च करून अखेरीस क्षयरुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढती आहे. औषधांना होणारा वाढता प्रतिरोध लक्षात घेता या रुग्णांना मोकळ्या नैसर्गिक जागांवर उपचार मिळावे, असा प्रस्ताव शिवडी क्षयरुग्णालयाने सरकारपुढे मांडला आहे.

शहरातील वाढती गर्दी, लोकसंख्येचा सातत्याने वाढता रेटा यामुळे क्षयरोगाची लागण होण्याचे प्रमाण ज्या पटीमध्ये वाढते, त्याच पटीमध्ये रुग्णालयांतील गर्दी वाढते. क्षयरुग्णाचा प्रादूर्भाव अन्य रुग्णांना होऊ नये यासाठी विशेष वॉर्डमध्ये रुग्णांना ठेवण्यात येते. या वॉर्डमध्ये एमडीआर, एक्सडीआरचा प्रादूर्भाव झालेल्या रुग्णांचाही एकत्रित भरणा असतो. त्यामुळे संसर्ग पुन्हा त्याच वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रुग्णांसाठी आता प्रतिजैविकांचा प्रतिरोध मोडून काढणाऱ्या जागी वैद्यकीय उपचार करण्याची गरज प्रकर्षाने आहे. केवळ राज्यातच नव्हे तर, देशामध्ये ज्या ठिकाणी सॅनिटोरिअम (वैद्यकीय उपचार मिळू शकतील अशा नैसर्गिक मोकळ्या जागा) आहेत त्या ठिकाणी रुग्णांना ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

क्षयरोगासाठी देण्यात येणाऱ्या अनेक औषधांचे दुष्परिणामही रुग्णांवर वेगाने दिसतात. हातपाय दुखणे, सांधेदुखी, पोटात मुरडा येणे, त्वचा काळी पडणे, उलट्या होणे यासारख्या शारीरिक लक्षणांसह नैराश्य येण्याचे प्रमाणही वाढते आहे. या नैराश्यामुळे रुग्णांनी स्वतःच्या जिवाला इजा पोहचवू नये यासाठी शिवडी क्षयरुग्णालयांच्या गच्चीवर जाळ्या लावून घेण्यात आल्याचे रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर पवार सांगतात. या प्रकारे केवळ रुग्णांना वेगळे ठेवून प्रश्न सुटणार नाही. त्यांचा संसर्ग वाढू नये हे वैद्यकीयदृष्ट्या योग्य असले तरीही रुग्णालयाच्या बंदिस्त वातावरणामध्ये वाढत्या प्रतिरोधाला उत्तर मिळणार नाही. त्यामुळे देशातल्या अशा काही मोकळ्या हिरव्या जागांवर या रुग्णांच्या पुनर्वसनाचा विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे.

ओझोन थेरपी मदतीची

क्षयरुग्णांना श्वास घेण्यासाठी खूप त्रास होतो. दम लागतो. शरीरातील ऑक्सिजनची मात्रा सातत्याने कमी होते. ओझोन थेरपी दिल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढण्यासाठी मदत होते. यापूर्वी रक्ताच्या वा थुंकीच्या काही विशिष्ट प्रकारच्या चाचण्यांमधून क्षयरोगाची लागण झाल्याचे निष्पन्न होते. सीरिअॅक्टिव्ह चाचण्यांमुळे शरीराच्या बाह्यलक्षणांसोबत पेशींमध्ये अंतर्गतरित्या किती सूज आली आहे, हे लक्षात येते. त्यामुळे निश्चित निदानाशिवाय होणारा प्रतिजैविकांचा माराही थांबतो व उपचाराची दिशा स्पष्ट होते.

दारू, कुपोषण, डाएटिंग

कुपोषणामुळे सर्वाधिक महिला क्षयरोगाला बळी पडतात असे दिसून आले आहे. जे अन्न खातात ते पोषक नसल्यामुळे क्षयाची लागण वाढती आहे. मुंबईतल्या क्षयरुग्णालयामध्ये प्रत्येक वर्षी सहा ते साडेसहा हजार रुग्ण दाखल होतात. त्यात ६० टक्के प्रमाण महिलांचे असते. पुरुषांना क्षयरोगाची लागण होण्याचे प्रमाण तीस टक्के आहे. त्यातही दारूचे व्यसन असलेले अनेकजण औषधोपचारांनंतरही व्यसन न सुटल्यामुळे खंगतात. वजन कमी करण्यासाठी आहारावर काट मारली जाते. डाएटच्या नावाखाली वजन कमी करण्यामुळेही क्षय बळावतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *