लाचेत मागितली दोन किलो मटण बिर्याणी

सरकारी अधिकारी, कर्मचारी हे नागरिकांची कामे करून देण्यासाठी पैशाच्या, भेटवस्तू या स्वरूपात लाच मागतात. परंतु, महसूल विभागाच्या एका मंडल अधिकाऱ्याने पैशाबरोबरच दोन किलो मटन बिर्याणी लाचेच्या स्वरूपात मागितली होती. या मंडल अधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाने लाच घेताना पकडले.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगावचा मंडल अधिकारी उल्हास यशवंत कवडे (वय ५७, कोपरगाव) याला एसीबीने अटक केली आहे. याबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) कोपरगावमधील एका नागरिकाने तक्रार केली होती. या तक्रारदाराने आई, भाऊ व स्वतःच्या नावाने प्लॉट खरेदी केला होता. या खरेदी खताची नोंदणी करण्यासाठी व सात-बारा उताऱ्यावर नावे लावण्यासाठी मंडल अधिकारी कवडे याने पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने एक हजार रुपये मंडळ अधिकाऱ्याला दिले होते. सात-बारा उतारा घेण्यासाठी तक्रारदार हे कवडे याला भेटल्यानंतर त्याने उर्वरित लाचेची १४ हजार रुपयांची रक्कम व २ किलो मटन बिर्याणीची मागणी केली केली. ही रक्कम व बिर्याणी माहेगाव देशमुख येथील तलाठी कार्यालयात देण्याचे ठरले होते. तलाठी कार्यालयात एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. तक्रारदाराकडून चौदा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना मंडल अधिकारी कवडे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला लाच मागितल्याच्या गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सरकारी कर्मचारी व अधिकारी लाचेची मागणी करत असतील तर १०६४ या टोल फ्री क्रमांकावर याबाबत तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *